Monday, January 7, 2013

जेव्हा तू माझ्याकडे रोखून बघतेस ना....


मी जेव्हा या तुझ्या चेहऱ्याकडे बघतो ना...
दोन क्षण मला तसंच तिथे थांबावंस वाटतं.
पण जेव्हा तू माझ्याकडे रोखून बघतेस ना..
सारं जग मला तसंच तिथे थांबवावंस वाटतं.

मग सारं जग स्थिर, अन मी तुला बघायचं..
मग तुला हळूच माझ्या मिठीत घ्यावंस वाटतं.
पण जेव्हा तू माझ्याकडे रोखून बघतेस ना..
सारं जीवन तुझ्यावर लुटवून द्यावंस वाटतं.

तू मिठीत अन तुझी नजर माझ्या नजरेखाली,
अख्खं जीवन मला त्या क्षणात जगावंस वाटतं.
पण जेव्हा तू माझ्याकडे रोखून बघतेस ना..
तर सारं काही विसरून, तू तसंच बघावंस वाटतं.

मग मी हि तुला तसंच, एक सारखं बघायचं..
मग ते सारं काही जुनं, नव्याने घडावंस वाटतं.. 
अन जेव्हा, तू माझ्याकडे रोखून बघतेस ना..
परत मला एकदा तुझ्या प्रेमात पडावंस वाटतं..

                                           ---वैभव.

Tuesday, December 4, 2012

पहिलं पहिलं प्रेमपत्र...


                त्याचं प्रेमपत्र...                                                                तिचं प्रेमपत्र...

काही सांगायचंय तुला, एकदा वाचून घेशील..                                 तू लिहिलेलं पत्र मिळालं मला तुझं काल.
नाही पटलं तुला तर फक्त पत्र फाडून देशील.                                 अन सोबत पाठवलेलं गुलाबच फुल लाल.

कधी बोललो नाही कारण धाडसंच झालं नाही,                                ए मला नव्हतं माहिती तू कविता करतोस ते.
अन धाडस झालं, तेव्हा प्रसंगच आला नाही.                                 अन कवितांमधून मुलींची मन चोरतोस ते.

आज अचानक वाटलं आज नाही तर कधी नाही..                             पत्र वाचून आधी थोडं घाबरल्यासारखं वाटलं.
एकदा सांगावंच सारं आता कसलीही भीती नाही.                             म्हंटलं यांनी कदाचित माझं मन तर नाही वाचलं.

तुला पहिल्यांदा पाहताच हे असं सारं घडलं होतं,                             पण मला आवडली तुझी कविता, छान होती फार. 
बघता क्षणीच मला तुझ्यावर प्रेम जडलं होतं...                              रमीनं पण वाचली, ती तर दिवानीच झाली तुझी पार. 

प्रेमात नक्की काय करावं हे तर माहिती नाही मला,                          ती तर म्हणे, आत्ता फोन कर, याला सर्व सांगून टाक.
पण स्वतः हूनही जास्त प्रेम करील अशी खात्री देतो तुला.                   मी म्हंटलं मी कशाला, त्यालाच करू दे ना सुरुवात.

आणखी काही सुचत नाहीये, जास्त लिहित नाही मी.                        अन काय रे, कोपरा कसा देणार, तू कसा सामावशील?
कारण या आधी कधी कुणाला पत्रही लिहिलं नाही मी.                        इथं तर साम्राज्यच तुझं आहे, जागा कशी गमावशील?

नाहीच पटलं तुला तर फक्त हे पत्र फाडून देशील.                             पण तरी, मी मात्र कधी बोलणार नाही, मी गप्प राहील.
मनाच्या एखाद्या कोपऱ्यात एक आठवण तेवढी ठेवशील.                  तूच बोलावं वाटतं मला, तोवर वाटल्यास मी वाट पाहिलं.

                                                                                                                                             --- वैभव.

Thursday, October 18, 2012

माज्या शाळेतली शिरोडकर...


आम्ही पण गेलो होतो शाळेत तर..
अन आमचीही एक शिरोडकर होती,
मंजे, तुमच्या शाळेतली जशी होती न
एकदम तितकीच ती बी सुंदर होती.. 

जोश्याची शिरोडकर म्हणून आलीस
अन थेट माझ्या हृदयात शिरलीस तू..
"तू काय करतोस हितं?" म्हणत म्हणत,
स्वतःबरोबर कुटंतरी घेऊन गेलीस तू.

च्यायला नरू मामा खरंच सांगायचा कि ते..
कुणालाबी नाई भ्यायचं, अगदी बिंदास राहायचं..
आपल्याच लाईन ला सुद्धा नाई कळेल कंदी..
अश्या कलेनं आपल्या लाईन कडे पाहायचं...

जोश्यासारखं मी हि तसंच सांगत होतो
कि "आपण नाई तसल्या भानगडीत पडत"..
पर आता असर असाकाही झालाय तुजा
का मनातून विचाराचं पाखरु बी नाई उडत.

पर एकदाची जेवापासून शाळा सुटली आपली..
पाटी फुटली आन सारंच वेगळं घडून राहिलं...
पर या मनाचं पाखरू मात्र सैरभैर आजही,
तुज्याच विचारासोबत मुक्त उडून राहिलं...

                                         -वैभव.

Friday, October 5, 2012

आज परत पाऊस कोसळून गेला...

आज परत पाऊस काही आठवून गेला..
अजूनही नितांत प्रेमात आहे मी तुझ्या,
परत तेच ते एक मनाला पटवून गेला.

झाडांची पानं चिंब न चिंब भिजवून गेला..
भिजवलेल्या हिरव्या गार झाडांसोबत,
साऱ्याच जुन्या गोष्टी मनात सजवून गेला.

रुसून असलेल्या कळ्यांना हसवून गेला..
आणि कसाबसा जरा बाहेर मी येत होतो,
तर परत तुझा चेहरा मनावर ठसवून गेला.

पाऊस आला, कोसळला आणि निघून गेला..
मी बसून होतो तसाच.. तिथेच झोक्यावर एकटा,
मला आतल्या आत भिजत असताना बघून गेला.

                                                    --वैभव.

Monday, October 1, 2012

म्हणजे ती कधीच...

आज अचानक माझ्या मनात एक विचार आला...
काय होईल जरा उद्याचा दिवसच निघणार नाही..
म्हणजे सूर्य लपून राहील अन रात्रच संपणार नाही.. 

म्हणजे ती कधी सकाळी खिडकीत दिसणार नाही..
ओले चिंब केस लांब सडक कधीच पुसणार नाही..
अन खाली नजर करून गालात हसणार ही नाही..

म्हणजे ती बसच्या लाईनीत येऊन वाट बघणार नाही..
समोरच्या टपरीवर तिचे डोळे मला शोधणार नाही..
अन माझ्या साठी स्वतःच्या दोन बस सोडणार नाही..

कॉलेज सुटल्यावर मोडीवर नजरा मिळणार नाही..
मला बघण्यासाठी अधून मधून मागे वळणार नाही..
आणि... आणि...
माझ्या मनाच्या भावना तिला कधीच कळणार नाही..

खरंच, काय होईल उद्या जर सूर्यच उगवणार नाही..
दिवस म्हणू की रात्र, ते मला कधीच बघवणार नाही..
कारण,
अश्या या दिनचर्येशिवाय तिच्या मी जगू शकणार नाही..

                                                          -वैभव.

Saturday, September 29, 2012

हितगुज... तिचं नि त्याचं...

ती एकदा म्हणाली मला,
की तू नक्कीच कुणावर तरी फार प्रेम करतोस..
नाहीतर एवढ्या कविता कश्या काय करतोस...
       मी म्हणालो,
       अग त्यासाठी प्रेम करावंच लागतं असं नाही..
       तर जणू मनातल्या भावनांना फक्त शब्द देणं जसं काही..

ती म्हणाली,
नाही काही, मनाला पटणारं असं कुणी भेटलं ना मनाला..
की तरच मुळी आपल्या मनामध्ये त्या भावना जागतात..
       मी म्हणालो,
       तसंच नाही गं,, पण आतंच जास्त गर्दी झाली ना कधी..
       तर त्या आपोआप अश्या शब्दांद्वारे बाहेर येऊ बघतात...

ती म्हणाली,
ठीक आहे, समज पटलंय मला तू जे काही म्हणतोयस..
पण मग तुझ्या प्रत्येक कवितेत 'ति'चाच उल्लेख का असतो?
       मी म्हणालो,
       अगं, आता त्या भावना आहेत "या वेड्या मनाच्या"..
       त्यांच्यावर माझा असा नेहमीच पुरेपूर ताबा नसतो..

ती गोड हसली, म्हणाली,
हा हा हा, तुझ्याच मनावर तूझाच ताबा नाही..
म्हणजेच इथे नक्कीच शिजतंय काही तरी..
       मी म्हणालो,
       बरं बाबा, तुला जे समजायचं आहे ते समज..
       पण खरंच, अजून मला प्रेयसी नाही खरी खुरी..

मी मग मनात म्हणालो, 
इला आता सांगू तरी कसा, की तूच माझी प्रेरणा खरी..
दुसरी तिसरी कुणीही नसून तूच आहेस माझी स्वप्नपरी..
       ती मनात म्हणाली..
       काय सांगू, मलाही मनापासून वाटत एखादे वेळेस कधीतरी..
       की मलाही कधी भेटावं असं, तुझ्यासारखच कुणी तरी..

                                                              -वैभव.

Monday, September 24, 2012

एकच होते हृदय मला...

कधीतरी एकदा असे काही घडले...                      
की मन हे माझे तुझ्यात जडले..
अन मी नकळत तुझ्या प्रेमात पडले..
प्रेमा पायी तुझ्या मी घरदार सोडले.. 
जीवन भर जपलेल्या नात्यांना तोडले..
साऱ्यांचे विश्वास काही क्षणात मोडले..

हृदयाच्या अश्रुंवर खोटे अंथरूण ओढले..
होते नव्हते मनात ते सर्व संशय काढले..
अन तू दिलेल्या वचनांच्या दारी चढले..

तू मात्र क्षणभरात सारेच काही मोडले...
असा वागलास जणू काही नाही घडले..
अन कुणा दुसरी साठी तू मला सोडले..

मग एक दिवस तू अचानक परत आलास.
म्हणालास "जुनं सारे काही विसरून जा..
परत एकदा माझ्या प्रेमात पडून पहा.."

मी तर परत तयार होऊन जाईल ही रे..
पण परत मन जडणार नाही त्याच काय..
कारण परत प्रेम करायला हृदय कुठाय..

एक संधी देण्यासाठी तू हातही जोडलेस..
पण एक गोष्ट तू पुरताच विसरून गेला..
एकच होते हृदय मला.. ते तूच तर तोडलेस..

                                            -वैभव.

Monday, September 17, 2012

मलाही एकदा खऱ्याखुऱ्या प्रेमात पडायचंय तुझ्या...


वर वर सांगत असतो मी सर्वांना नेहमी की,
मी नाही आहे प्रेमाच्या वैगेरे फंदात ते बरंय..
पण खरं सांगू का गं तुला, असं वाटतं कधी की,
मलाही एकदा ना खऱ्याखुऱ्या प्रेमात पडायचंय.

जे सारं काही कवितांमध्ये लिहित आलोय ना 
ते सारं नेहमी प्रत्यक्षात तुजसाठी करायचंय.
स्वप्नाबाहेर एकदा खऱ्या प्रेमात पडून तुझ्या
त्या सुंदर कल्पनेचा मला अनुभव घ्यायचाय.

स्वप्नात तर रोजच पडतो मी तुझ्या प्रेमात,
एकदा बाहेरही ये ना गं खरीखुरी कधीतरी..
तुझ्यावरच लिहिलेल्या त्या कविता वाचून
तुझ्याबद्दल विचारतात माझे मित्र कितीतरी.

कधी कधी ना देवावरही मला राग येतो थोडा,
सगळीकडे प्रेमाचा फार आरडा ओरडा असतो..
जणू देवाने वर्षावच लावलाय प्रेमाचा इथे तर..
पण या वर्षावात मीच एक फक्त कोरडा असतो..

साक्ष आहे खऱ्या प्रेमाची, खरंच सांगतो मी,
रोज सकाळी देवाजवळ तुलाच मागतो मी..
स्वप्नात येतेस तर असं नाही की झोपलोय
तर तुझ्याच विचारात दिवसरात्र जागतो मी..

                                               - वैभव.

Saturday, September 8, 2012

पण जेव्हा तू अशी...


तू जेव्हा अशी नजरे आड असतेस ना...
जीवन ना, फार सुनं सुनं वाटतं,
ताजं एखादं फूल सुद्धा जुनं जुनं वाटतं.

          पण जेव्हा तू माझ्या जवळ बसतेस ना...
          सारं जग कसं अगदी नकोसं वाटतं,
          अन त्या क्षणाने तिथंच थांबावसं वाटतं. 


तू जेव्हा कधी अशी रुसून बसतेस ना...
माझंच मन मला खायला धावतं,
अन वेड्या वाकड्या कसरती करायला लावतं.

          पण मग जेव्हा तू छान लाजून हसतेस ना...
          त्या कसरतींच पण मनाला वेड लागतं,
          अन मन तुला तसंच हसताना बघायला लावतं.


तू जेव्हा कधी अशी जवळ नसतेस ना...
आयुष्य कुठेतरी अपूर्ण वाटतं,
जणू मनावर कसलंतरी मोठं ऋण वाटतं.

          पण जेव्हा तू माझ्या जवळ असतेस ना...
          ते ऋणही मला फार हिनं वाटतं,
          अन माझं अर्धवट आयुष्य ते पूर्ण वाटतं.


                                                    -वैभव.

Thursday, September 6, 2012

असं कधीच वाटलं नव्हतं...

 कधी तरी असं पण घडेल
असं कधीच वाटलं नव्हतं.
मन कधी कुणासाठी एवढे झुरेल
असं कुणीच मनाला पटलं नव्हतं.

अशीही कधी अवस्था होईल
असं कधीच वाटलं नव्हतं.
डोळे बरेचदा पाणावले होते पण
हृदयात कधी पाणी साठलं नव्हतं.

कधी एकदा असाही प्रसंग येईल
असं कधीच वाटलं नव्हतं.
लाखोंच्या विरोधातही हात घट्ट पकडून ठेवणार
असं कुणीच आजवर भेटलं नव्हतं.

मी ही प्रेमात पडेल कधी कुणाच्या
असं कधीच वाटलं नव्हतं.
कारण इतक्या प्रेमाने स्वतःच्या कुशीत
कधीच, कुणीच गाठलं नव्हतं.

कारण "प्रेम करतो" असे बरेच म्हणाले होते
पण कधीच, काहीच वाटलं नव्हतं.
पण थेट मनाची साद येईल इतक्या आपुलकीने
कधीच, कुणीच म्हटलं नव्हतं.

--वैभव